Friday, 11 May 2018

माहेर



मला ना, असं नीट संगतवार नाही सांगता येत पण प्रयत्न करते. तशी मी कॉमर्सची पोस्टग्रॅज्युएट पण असं धडधडुन नाही बोलता येत. इतक्या मैफिली करते पण, गातांना असलेला आत्मविश्वास बोलतांना कुठे जातो कोणास ठाऊक. पण अरू, म्हणजे माझा नवरा, नेतो निभावून सगळं. 

पण आज सांगणार आहे.  अगदी भरल्या मनानं. डोळ्यात पाणी आलं तरी थांबणार नाही. बायकोच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या नवऱ्याविषयी बायकोने सांगायचं नाही तर कुणी?

अदूच्या, आमच्या मुलाच्या ऑफिसच्या उद्घाटनाच्या दिवशीच अरुनं त्याला सांगितलं ,
 "तुझ्या कंपनीचा टर्नआओव्हर पन्नास कोटींवर गेला कि मी रिटायर होणार".
" आणि काय करणार "
" मला भरपूर काम आहे. मला देणं द्यायचंय. मी आपल्या शेतीवर जाणार."

मग आम्ही अरुची खूप चेष्टा केली. याला काळ्या मातीचं देणं द्यायचंय, तिचे पांग फेडायचेत. असं बरंच. पण अरूनं नेमकं उत्तर दिलेलं नाही हे मला मात्र समजलं होतं. कळतात आम्हां बायकांना खरी आणि खोटी उत्तरं. म्हटलं जातो कुठे, कळेलच आज ना उद्या. पण त्याला जे देणं द्यायचं होतं ते असं इतकं मनात रुतून बसणारं असेल हे मात्र तेंव्हा नव्हतं वाटलं.अरू ना, तसा पूर्वीपासूनच विचित्र होताच. आमच्या लग्नाच्यावेळी नाही का असाच अडुन बसला कि माझं आणि माझ्या मित्राचं लग्न एकाच ठिकाणी होणार म्हणुन. अण्णांना (माझे वडिल) वाटलं कि असेल जवळचा प्रेमाचा मित्र. असते काहिंची दाट मैत्री. म्हणुन आण्णा सहज हो म्हणाले. पण मित्राचं नांव ऐकल्यावर चांगलेच सटपटले. 'अयुब' त्याचं नांव. अयुब आणि शमीमा यांचं लग्न आमच्याबरोबर, एकाचवेळी लागलं पाहिजे म्हणुन हट्टच धरला अरुनं.
 "वाटल्यास मी खर्च करतो त्यांच्या लग्नाचा पण एकत्र नको". अण्णांनी ऑफर दिली.
 तर हा म्हणाला, "शब्द बदलु नका.माझ्या लग्नाचा खर्च मीच करणार हे तुम्ही मान्य केलंय. लग्न माझं आणि बोजा तुमच्यावर हे कुठलं गणित?"

जुनी माणसं ती. त्यांना हे पचणं जरा अवघडच होतं पण अरूनं पटवलं. एकाच मांडवात मंगलाष्टका आणि निकाहनामा म्हटल्या गेल्या.

अयुब, म्हणजे अरूची सावलीच. लहानपणापासून बरोबर. अरू धडपडत शिकला आणि फॅब्रिकेशन वर्कशॉप चालू केलं. पहिला माणूस नेमला तो अयुब. बिचारा आई-बापाविना वाढलेला. शिक्षणाचा गंध नाही. अरूसारखा मित्र हीच काय ती जमेची बाजू. जमेल ते काम करून पोट भरायचा. मनानं अति निर्मळ.घरदार नसलेल्याला मुलगी तरी कोण देणार? पण शोधली अरुनं. शमी पण अयुबसारखी अनाथ. पण काय देखणी रूपानं. स्वयंपाक तर असा करते किं बोटं चाटावीत जेवल्यावर. तिच्या मावशीच्या नवर्याला अरूनं सांगितलं कि तुम्हांला मुलगा पसंत असेल तर फक्त हो म्हणा, बाकी या दोघांची आयुष्यभराची जबाबदारी माझी.

आमच्या लग्नानंतर व्यवसायाने अशी झेप घेतली. दिवसाचे चोवीस तास कमी पडावेत. दहा वर्षांत एका लहान वर्कशॉपची चांगली चारशे माणसांची कंपनी झाली. आम्ही विठ्ठलवाडीला आता राहतो ना तो बंगला बांधला. आम्ही म्हणजे, अयुब आणि शमीसुध्दा. त्यांना बंगल्याच्या आवारात खोल्या काढुन दिल्यात. अयुब म्हणजे ड्रायव्हर कम असिस्टंट कम बरंच काही. तर शमी सतत माझ्याबरोबर. घरीदारी, मैफिलीला सतत बरोबर.

सगळं चांगलं होतं पण म्हणतात ना काहितरी खुसपट काढल्याविना मनाला शांत बसवतच नाही म्हणुन. तसं म्हणा हवं तर. पण आज सांगते, अरूची एक गोष्ट फार खटकायची मला. रोज त्याच्या तोंडुन नव्या मैत्रिणीचं नांव कळायचं. ही काय तर म्हणे कॉलेजमध्ये होती, तर ती तर बालवाडीपासुनची मैत्रीण. हीच्या बरोबर एकाच गल्लीत रहात होतो तर ती म्हणे माझ्या मावसबहिणी ची मैत्रीण म्हणून माझी मैत्रीण. सुरुवातीला छान वाटलं पण कुणा बाईला आपल्या नवऱ्याच्या इतक्या मैत्रिणी असलेल्या आवडतील? म्हणजे तुम्हाला वाटतं तसं वावगं काहिच नव्हतं. 'त्याअर्थी' अरू अगदी निर्मळ होता. पण चिडचिड व्हायची खरी. 

आमचा संसार वाढीला लागला. अद्वैतचा जन्म झाला. मग मला माझं गाणं थोडं आवरतं घ्यावं लागलं खरं पण सुख मात्र उतू जायला लागलं. आदूचं बालपण आम्ही मस्त एंजॉय केलं. आदू, अरु आणि आदूचा आबूकाका जाम दंगा करायचे. आई आणि आण्णा अगदी भरून पावले होते. तेव्हढ्यात किरकोळ आजाराचं निमित्त होऊन आई गेली. तिचे दिवसवारे करून येताना अरू आग्रहाने अण्णांना घरी घेऊन आला, कायमसाठी. ते घरी आले म्हणुन आनंद झाला खरा पण आई गेल्याने माहेर नसल्याचं वाटायला लागलं. मी अरूला तसं बोलुनही दाखवलं तर तो म्हणाला की आता तुझं सासर-माहेर एकच. छान आहे ना?

काय छान? माहेराची ओढ काय असते ते पुरूषांना काय कळणार? आईकडे जाऊन आयतं बसुन खाण्यातली मजा काय हे कसं समजवायचं? या एका मुद्द्यावर मात्र अरूच्या तीन मैत्रिणी म्हणजे रागिणी, नीला, रूपा आणि माझं एकमत झालं. त्या तिघींनीतर आई-बाप दोघांचंही छत्र गमावलं होतं. कालाय तस्मै नमः.

पण शेवटी काळच त्यावर उत्तर शोधुन देतो. आदू मोठा झाला आणि मी गाणं पुन्हा चालू केलं. आदूनं इंजिनिअरिंग पूर्ण केलं आणि आपण स्वतंत्र व्यवसाय सुरू करणार असल्याचं सांगितलं. त्यानं सॉफ्टवेअर कंपनी सुरु केली. त्याच दिवशी अरूनं त्याचा रिटायरमेंट प्लॅन सांगितला. आदूच्या प्रगतीनं सुखावलेले अण्णा थोड्याच दिवसांत गेले आणि माझं उरलंसुरलं माहेरही संपलं. मी फारच खंतावले. तर अरु म्हणाला, "करू काहितरी". 
 
पण काय करणार? 
माझे आई-वडील तर तो परत आणू शकत नव्हता ना. मग का असं बोलायचं त्यानं तरी? 
खोटी समजूत पण किती खोटी? 
तिला काही अंत? 
 
पण अरू म्हटलाय ना, मग करेल काहितरी. या आशेवर कढ सोसत राहिले. दर सणावाराला माहेरची सय यायची मला. सगळी सुखं दारात होती पण आता कुठंतरी एक हळवा कोपरा होताच . 

गेल्या पाडव्याची गोष्ट. आपल्या कंपनीला तीन वर्षे झाली म्हणून आदूनं जंगी पार्टी दिली. आणि टर्नओव्हर पन्नास कोटींवर गेल्याचं जाहीर केलं. अरूनं दुसऱ्याच दिवशी आपल्या कंपनीचाही कारभार त्याच्या हाती दिला. आम्ही भोरच्याजवळ काही शेतजमीन घेतली होती तिकडं निघाला. त्याला मातीचे देणं द्यायचं होतं ना! निघतांना बजावुन सांगितलं की, " एक वर्ष कोणीही तिकडं फिरकायचं पण नाही,अगदी अयुबसुध्दा नाही."

तो जाऊन आता वर्ष होत आलं. तसा तो अधुनमधून यायचा पण काय चाललंय हे अजिबात सांगायचा नाही. परवा त्याचा फोन आला आणि म्हणाला की ,
 
 "या रविवारी तू आदूच्या गाडीतून ये."
"का? अयुब कुठे जाणार आहे?"
"अयुबला राहू दे, तू मी सांगतो तसं कर."

रविवारी अयुबची गाडी आणि आमची गाडी एकाचवेळी शेतावर पोहोचल्या. अयुबच्या गाडीत आणखी कोणी होतं. मी काही विचारणार एवढ्यात आदू जोरात ओरडला,

" आईईईई, ते बघ काय सुंदर घर!"

समोर एक नितांतसुंदर वाडाटाईप घर होतं. घरावरनं नजर हटत नव्हती इतकी देखणी वास्तू. कौलारू छप्पर, पुढं ऐसपैस ओसरी, ओसरीमध्ये झोपाळा. घराला नावाची पाटी होती पण ती झाकलेली होती. अरू पुढे आला आणि म्हणाला, 
 
" निशा, कसंय सरप्राइज?"
"या, तुम्ही पाचही सुवासिनी पुढे या."

पांच?

मी मागे वळून बघितलं तर रुपा, नीला, रागीणी आणि शमी होत्या. शमीचं काही नाही पण या तिघी यावेळी इथं कशाला? मी अयुब कडे प्रश्नार्थक नजरेनं बघितलं तर त्यानं माहित नाही अशा अर्थाने खांदे उडवले.

" या पुढे या आणि घराचं उद्घाटन करा. ते पाटीवरचं कापड काढा. पांच जणींनी मिळून. मला माझं देणं देऊ देत."

आम्ही कापडाला हात लावला. त्या तिघींबरोबर हात लावताना कसंसच झालं मला. कापड निघालं, नांव झळकायला लागलं. काळ्याशार दगडी पाटीवर सोनेरी अक्षरात नांव होतं

'मा हे र '

क्षणभर सुचलंच नाही. काहितरी लक्ककन हललं आतमध्ये. थोडा वेळ अशाच अवस्थेत गेला. हळूहळू मन ताळ्यावर यायला लागलं.
 
 पण हे काय? 
नजर अशी अंधुक का? 
डोळ्यासमोर हा पडदा कसला? 
आणि हा हुंदक्यांचा आवाज? 
 
आणि ही मिठी कोणाची? एक नाही चार-चार जणींचे हात गळ्यात पडलेले आणि एरवी सुरांची बरसात करणारा माझा कंठ असा कसा दाटलेला?

मला माहेर देणाऱ्या नवऱ्याबद्दल प्रेम की मैत्रिणींना पण माहेर देणाऱ्या माझ्या 'अरूचा' अभिमान? 
काय, काय सांगू?

मी आधीच सांगितलं ना,  मला नाही सांगता येत.

No comments:

Post a Comment

कानसेन-घराणं पुणे

 संगीतक्षेत्रात घराण्यांचा मोठा बोलबाला अजुनही आहे. प्रत्येक घराण्याचं आपलं असं एक गायकी वैशिष्ट्य आहे. किंबहुना ही वैशिष्ट्यविविधता हाच दोन...