Saturday, 26 January 2019

गणतंत्र

गणतंत्र


ज्यानेवारी म्हणजे कैलासावर अपार थंडी. अगदी दुपारीदेखील सोमरस प्राशन केल्याशिवाय अंगात ऊब येत नाही. पण त्याचा देखील एक फायदा आहे, आमचे सोमरस पानाने लालजर्द झालेले नेत्रकमल (काहिही हं श्री) पाहुन कोणीही आमच्याशी स्वताहुन बोलायला येत नाही. त्यामुळे आमचे परमविद्वान मित्र कृष्ण द्वैपायन व्यास (यांना आम्ही प्रेमाने के. डी. म्हणतो) यांनी आमच्या अफाट आचरटपणाला आवर घालण्यासाठी सुचविलेले मौनव्रत आपोआपच घडते. त्याकारणे कैलासावर सर्वत्र शांतता असते. नाही म्हणायला पार्वतीवैनी चिडचिड करत असतात.पण आमच्यासारख्या भक्तगणांना तासातासाला गरमागरम चहा करून पाजायचा म्हटल्यावर त्या माऊलीची चिडचिड होणारच ना.

तर, अशीच एक सोमरस कृपेने ऊबदार सकाळ होती. पार्वतीवैनींनी भरल्या पहाटेच (साडेनऊ वाजता) त्यांची प्रसिध्द भूपाळी म्हणजे
'श्रीखूळ भावजी उठा आता,
उन्हं तापायला लागली तरी
लोळतांय काय गाढवासारखे',
ही गाऊन आम्हांला जागृत अवस्थेत आणले होते. केवळ दोनच कप चहा घेऊनआणि केवळ उबेसाठी म्हणून (किती उदात्त कारण!) सोमरसाचा साठा थोडा हलका करून आम्ही उन खात बसलो होतो. तेवढ्यात शंकर अण्णांचा आवाज आला. आम्ही नाही म्हटलं तरी अंमळ गुंगीतच होतो.
"रामराम आण्णा" आम्ही
"खूळ्या, लोळतोयेस काय. कामं नाहीत का.सगळे भूतगण कुठं गेले?" आण्णा.
" आण्णा, आज सुट्टी. सव्वीस ज्यानेवारी आज."
" मग काय झालं? कुणाची जयंती का पुण्यतिथी?"
" न्हाई, तसं न्हवं, पन् गनतंत्र दिस हाय न्हवं आज"
"आधी तू  त्या कोल्हापूर स्पेशल मालिका बघणं बंद कर. खुळ्या, किडमिड्या स्वत:ला काय राणादा समजतो का काय? आणि हे गणतंत्र म्हणजे काय?"
अण्णांचा गोळीबंद सवाल.
आमची बत्ती गुल. गणतंत्र म्हणजे काय सांगावं याचा विचार करून तंतरलो. नागरिकशास्त्र हा विषय केवळ दहा मार्कांचा असल्याने आम्ही ओप्शनला टाकलेला.
" गणतंत्र दिवस म्हणजे, ......म्हणजे असं असतं" आम्ही
"अडखळतोस काय? उतरली नाही का?"
" हां, (युरेका, युरेका) गणतंत्र म्हणजे सुट्टी असते आण्णा." आम्ही.
" तेच तर विचारतोय. म्हाईत नाही तर विचारून सांग."

कोणाला बरं विचारावं? आम्ही त्वरित आमचे परमविद्वान मित्र कृष्ण द्वैपायन व्यास उर्फ केडी यांनाच फोन लावला. त्यांना सगळंच ठाऊक असतं.म्हणुनच, 'व्यासोच्छिष्टं जगदसर्वम' असं म्हणतात ना.
"गणतंत्र म्हणजे सार्वभौम प्रजासत्ताक". इति केडी.
आता आली का पंचाईत! काही म्हणजे काही कळलं नाही. व्यासवाणी समजणं इतकं सोपं नाही म्हाराजा.

आमचा गोंधळ अधिकच वाढला. आता ब्रह्मादादालाच विचारावं. तर ब्रह्मादादा ब्रह्मानंदी टाळी लावुन बसलेले. थांबणे भाग होते. कोपरा धरून बसलो तर म्हणतात ना
 'संगति संङदोष:'. म्हणजे आमची देखील ब्रह्मानंदी टाळी लागली. अहाहा, अगदी हवेत विहरत होतो. पण हे काय? हा आवाज कसला. डोळे उघडले तेव्हा ब्रह्मादादा आमच्या गालावर थापट्या मारून आम्हाला जागे करत होता.

" किती घोरतोस तू श्रीखूळ? आमच्या साधनेत व्यत्यय आला. काय हवंय तुला?" अगदी मधाळ आवाजात
" अं, अम्, यम्, गणतंत्र, सार्वभौम प्रजासत्ताक". आम्ही
" अरे बरळतोस काय असा. नीट घडाघडा बोल". आता आवाज करडा.
" प्रणाम ब्रह्मादादा, गणतंत्र म्हणजे काय?" आमची नम्र पृच्छा.
" हं...............! श्रीखूळ, हा विषय तुला समजावणं माझ्या कुवतीबाहेर आहे. ज्या दिवशी तुला अक्कल येईल तो दिवस माझ्यासाठी मोक्षप्राप्तीचा असेल." ब्रह्मादादा हताश होऊन म्हणाले. कलियुगात आमच्या मातोश्री, तमाम शिक्षकवर्ग आणि आमच्या सुविद्य पत्नी या सर्वांचं या एका बाबतीत एकमत होतं.

"हे बघ, कलियुगात जंबुद्वीपात, भरतखंडात, महाराष्ट्रात भीमराव उर्फ बाबासाहेब नावाचा ज्ञानसूर्य जन्माला येईल. त्यांनी लिहिलेलं वाचशील तर तुझ्या रिकाम्या डोक्यात उजेड पडण्याची शक्यता आहे. जा आता तू. आमची साधनेची वेळ झाली."

ब्रह्मादादा उपाय सांगुन गेले. पण ज्ञानसुर्याचं लेखन न वाचता कपाटात ठेवून देऊन त्यावर निरर्थक वाद घालण्याऐवजी जर ते वाचून त्याप्रमाणे ज्ञान प्राप्त करणे असं जर केलं तर कलियुगातील जंबुद्विपातील भरतखंडातील लोक मला खेटरानं मारतील याची मला जाणीव असल्याने ते शक्य नव्हतं.

सरळ विष्णुभाऊंकडे गेलो. तर विष्णुभाऊ शेषनागाच्या शेपच्या सोफ्यावर आराम फर्मावुन राहिलेले. आम्हांला पाहुन लक्ष्मीवैनींच्या कपाळावर आठ्या.
" काय हवंय?" लक्ष्मीवैनी
आम्ही हात चोळत बोलायला सुरुवात करणार तोच लक्ष्मीवैनींनी आमच्या हातात मोहरांचा हंडा ओतायला सुरूवात केली. नेहमीसारखा कडकी लागली म्हणुन मागायला गेलो असा त्यांचा समज झाला. मिळालं ते घेतलं. पण प्रश्र्न तसाच. पाय घासत परत कैलासावर आलो तर पार्वतीवैनी दारातच उभ्या. अवतार मात्र दुर्गेचा.
" झालं का गांव कोळपुन? वैनीला काडीची मदत करता येत नाही तर गिळायला तरी वेळेवर हजर रहायचं."
" गणतंत्र म्हणजे काय हे शोधायला गेलो होतो."
" पाहिजेत कशाला नसत्या उचापती?.  चारीठांव गिळायला मिळतंय, तुमच्या डोक्यात कवडीइतकीही अक्कल नसतांना देखील तुमचे दादा, भाऊ आणि आण्णा प्रत्येक गोष्ट तुम्हाला विचारूनच करताहेत. आणि तुम्ही फिरतांय अक्कल शोधत." पार्वतीवैनी कडाडल्याच.

आईशप्पथ खरं सांगतो, गणतंत्र म्हणजे काय हे इतक्या सोप्या शब्दात कोणीच समजावलं नव्हतं.

मुकाट्याने आम्ही पार्वतीवैनींनी दिलेल्या प्रसादावर तुटून पडलो.

गणतंत्र चिरायू होवो.

श्रीखूळ
२६ जानेवारी २०१९.





Sunday, 23 September 2018

गब्बर का रिटेल अलायन्स




'गब्बर' हे खलनायकी नांव कोणी व्यवसायात वापरेल का? 

नाही ना? उगाच, लोकांना नांवें ठेवायला कारण सापडायला नको. या भावनेतुन कोणीही स्वत:ला 'गब्बर' म्हणवुन घेणार नाही.
पण काय आहे ना कि,  सगळेच असे भिऊन व्यवसाय करणारे नसतात. वेगळी वाट निवडून तीवर वाटचाल करण्याचं स्वप्न आणि सामर्थ्य असणारे प्रत्येक बाबतीत वेगळेपण जपतात.

'Retailware' या Retail व्यवसायासाठी उपयुक्त अशा,  अत्यंत ग्राहकप्रिय सॉफ्टवेअरचा रचनाकार 'अजित थदानी', हा असाच एक यडचॅप माणूस स्वत:ला 'गब्बर' म्हणवुन घेतो. त्याच्या व्हिजिटींग कार्डावर Ajit Thadani, CEO, गब्बर, Retailware Softech Pvt LTD. असंच छापलंय चक्क.

तुम्ही त्याला भेटलात ना कि पटेलच तुम्हाला की 'आदमी सचमुच गब्बरदिल ईन्सान है'. का, ते पुढं सांगतोच, पण आधी थोडं 'गब्बर' विषयी जाणुन घेऊयात ना.

इंजिनिअरिंग, एमबीए, झाल्यावर हा सरळ वडिलांच्या बरोबर व्यवसाय करायला लागला. उत्तम चाललं होतं पण वेगळं, स्वता:चं काहीतरी करायची अंत:प्रेरणा स्वस्थ बसू देत नव्हती. सॉफ्टवेअर उद्योगाचा सूर्योदय होत होता आणि याला संधी दिसली. Retail दुकानांना लागणारे सॉफ्टवेअर बनविण्याची. मग अभ्यास सुरू झाला. चक्क एका किराणा दुकानात तासनतास बसुन हा व्यवसाय कसा चालतो आणि त्याचं सॉफ्टवेअर बनविण्यासाठी काय केलं पाहिजे, त्यात काय-काय सोयी असायला पाहिजेत असं सगळं समजावून घेतलं आणि त्याच  'सुराणा कॉर्नर' या दुकानात बसुन Retailware हे सॉफ्टवेअर लिहिलं. हे म्हणजे, युध्दभूमीवर तोफांचा कारखाना काढण्यासारखंच कि हो!  पण अशाच अफलातून प्रयोगांनाच यश मिळतं ना. तसंच झालं. आज Retail Billing Software मध्ये Retailware चं नांव आदरानं घेतलं जातं. 'गल्ला छोडो आगे बढो' (आता बोला) ही  टॅग लाईन असलेलं हे सॉफ्टवेअर भारतातील २२ पेक्षा जास्त राज्यातील आणि अॉस्ट्रेलियातील दुकानदार वापरत आहेत. यामागे 'गब्बर'चे आणि त्याच्या सहकार्यांचे अपार कष्ट आहेत. आपल्या ग्राहकांना उत्तम तेच द्यायचं ही तळमळ आहे. 
आज हेच सहकारी त्याच्या कंपनीचे भागधारक देखील आहेत. ही सामाजिक जाणीव, हे 'गब्बर' चं आणखी एक वैशिष्ट्य. याच जाणिवेतून तो नगरच्या ख्यातनाम 'स्नेहालय' शी स्थापनेपासून जोडलेला आहे.

Retail Alliance-एक अफलातून योजना

सामाजिक भान असलेला उद्योजक केवळ स्वत: यशस्वी होण्यासाठी काम करत नसतो तर आपल्याबरोबर समाजातील घटकांना देखील पुढे घेऊन‌ जाण्याचा प्रयत्न करतो.‌ Retail Alliance द्वारा 'गब्बर'चादेखील हाच प्रयत्न आहे. Retail उद्योग वाढतोय, या उद्योगात अपार संधी आहेत. या संधीचा फायदा तरूणांनी घ्यावा, असं त्याला वाटतंय. रिटेल व्यवसायांसाठी लागणारी सॉफ्टवेअर तर तो पुरवतोच पण रिटेल व्यवसायाला लागणाऱ्या इतर सुविधा म्हणजे बारकोड व सामग्री, Retail Inventory Audit आणि व्यवसाय वृध्दी साठी मार्गदर्शन या सेवा. या देणारे 'पिनाको इंडिया', 'स्टॉकटॅली आणि 'Your Retail Coach', यांना बरोबर घेऊन एक भव्य स्वप्न तो बघतोय. Retail Alliance मार्फत या सेवा देशभरातील रिटेल व्यावसायिकांना मिळतील. यासाठी त्याला साथ हवीय ती गावोगावच्या 'तरुणाईची'. व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुणांना आपल्या समृध्द अनुभवाद्वारे मार्गदर्शन देऊन आणि त्यांना Retail Allinace  चे Channel Partner करून घेण्याची योजना आहे. Channel Partnerना आपल्या गावातल्या रिटेल ऊद्योगांचा सेवा-पुरवठादार होता येईल तेही एकाचवेळी 'चार' आवश्यक सेवांचे प्रतिनीधी होऊन. हे म्हणजे एकदम 'चौपट' ताकद आल्यासारखं आहे ना. बरं या सेवा वारंवार लागत असल्याने 'एक बार बेचो और बारबार कमाओ'. आहेना डोकॅलिटी! 

उगाच नाही, 'गब्बर' नांव लावत तो!

तुम्हांला भेटायचंय आणि Channel Partner व्हायचंय? अहो मग सरळ फोन करा कि 98509 33654 या नंबरवर. वाट कसली बघताय? संधी काय वारंवार येते थोडीच?

श्रीकुल
२१ सप्टेंबर २०१८.

Monday, 9 July 2018

पडवळ


पडवळ

मन्याकाका पडवळ गेला.

खरीच होती बातमी. शंकाच नको. मी नगरला ऑपरेशन्स करायला दर शुक्रवारी जातो, तसा यावेळी पण पोहोचलो. डॉ.दात्यांच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचतो ना पोहोचतो तोच निरुचा फोन आला.
"दादा, लवकर नीघ. बाबा गेले".
"आं! कसं काय अरे काल रात्रीच बोललो मी, तेंव्हा ठीक होता ना रे तो. असं अचानक काय झालं?"
"सकाळी ठीक होते. शेतावर जाऊन आले आणि जरा पडतो म्हणाले.आम्हांला विचित्रच वाटलं. म्हणुन विचारायला गेलो तोपर्यंत शांत झाले."

ऑपरेशन्स रद्द केली आणि तडक वाडीला, अटकरवाडीला निघालो. नगरहून कोपरगाव मार्गे दोन तासांचा तर प्रवास पण फार लांबचा वाटायला लागला.

मन्याकाकाच्या ओढीनं हा प्रवास शेकडो वेळा केलेला. लहानपणी तर कोपरगावपर्यंत एसटी आणि तिथुन पुढं कधी पायी तर कधी बैलगाडीने. कधीकधी आधी कळवलं असलं तर मन्याकाका फटफटी घेऊन न्यायला यायचा. एकदा वाडीवर मळ्यात पोहोचलो कि थेट विहिरीवर पोहायला. मन्याकाका म्हणजे 'काका, गुरू, मित्र, थोरला भाऊ' असं टोटल पॅकेज होता माझ्यासाठी. तसा तो आमच्या दादांचा सख्खा मावसभाऊ. त्याची आई, मथुमावशी ही माझी मावसआजी. काय प्रेमळ होती. आजही एखाद्या हुरहुरत्या क्षणी मावशी आजीचा सायीसारखा मऊ हात आठवतो, तिनं मायेनं दिलेले एक पैसा, दोन‌पैशाची नाणी आठवतात. गहिवरायला होतं. नवऱ्याच्यामाघारी तिनं अटकरवाडीसारख्या छोट्या गांवढ्यात राहून खंबीरपणे शेती आणि मुलगा दोन्ही अतिशय व्यवस्थित सांभाळलं. 
त्याचं खरं आडनाव देशपांडे. पण मन्याकाकाला सगळे 'मन्याकाका पडवळ' म्हणायचे. त्यातलं 'काका' हे विशेषण माझ्यामुळे चिकटलं. तसा तो माझ्यापेक्षा साताठ वर्षांनीच मोठा होता,पण 'काका' होता ना. मी लहानपणी सारखा त्याच्यामागे काका,काका करून हिंडत असे. त्यामुळे सुरूवातीला गंमतीने आजूबाजूचे पण त्याला मन्याकाका म्हणायला लागले, नंतर तेच कायम झालं.

पण त्याचं 'पडवळ' हे उप-आडनांव मात्र त्यानं स्वकर्तृत्वानं मिळवलं होतं.त्यामागे जरा गंमतच आहे.
आमची मथुआजी देवदेव फार करायची. गौरी-गणपती तर फारच निष्ठेने साजरे व्हायचे. तिच्याकडच्या गौरी काय सात्त्विक दिसत म्हणुन सांगू? रात्री समईच्या मंद प्रकाशात त्या गौरींच्या मुखवट्यांवर असं तेज विलसत असायचं कि वाटायचं माहेरी आलेल्या माहेरवाशीणीच जणू. मन्याकाका लहान होता त्यावेळची गोष्ट. असा गौरी-गणपतीचा सण होता आणि त्यादिवशी गौरी जेवणार होत्या. तो चारी ठाव स्वैपाक करण्यात मथुआजी गर्क होती, तेवढ्यात तासभर पोहून मन्याकाका घरी आला आणि भूक-भूक करायला लागला. पण त्यादिवशी तर गौरी जेवल्याशिवाय घरच्यांची जेवणं कशी होणार? मग मथुआजीनं त्याला कुठंतरी गुंतवायचं म्हणुन  म्हटलं कि, "मन्या, जरा मला पडवळाचे काप करून देतोस का रे बाळा? आजच्या‌ दिवशी लागतात रे".
"पडवळ?" शी! कसली गिळगिळीत असतात. मी हात पण लावणार नाही त्यांना".
आधीच तो सोवळ्यातल्या स्वैपाकाचा धबडगा आणि चुलीच्या धुराने मथुआजी कावली होतीच त्यात मन्याकाकाच्या धुत्काराची भर पडली. मथुआजीनं हाताला लागलेली पळी उचलली आणि मन्याकाकाला फेकून मारली. मन्याकाकानं ती चुकवली पण पडवळावरून आई आपल्याला रागावली हे मात्र त्याला लागलं. ती पळी मथुआजीला परत देत तो तिला म्हणाला, "आई, तू पडवळावरून मला रागावलीस ना? तर ऐक आता, मी आजपासून रोज पडवळाची भाजी खाणार". झालं. मन्याकाका व्यसन असावं तसं रोज पडवळ खायला लागला. कॉलेज साठी कोपरगांवला गेलेल्या मन्याकाकाला रोज वाडीवरून घरचा डबा जायचा. अगदी पडवळाच्या भाजीसकट. आधी तो 'मन्याकाका' होताच आता या पडवळाच्या भीष्मप्रतिज्ञेमुळे सगळे त्याला 'पडवळ' म्हणायला लागले.

पण एकूणातच मन्याकाका असा मुलखावेगळा वागायचा. चांगली मेडिकल साठी बी जे ला अॅडमिशन मिळालेली पण 'म्हातारी' एकटी पडेल म्हणुन मेडिकल सोडुन कॉमर्सची वाट धरली. ग्रॅज्युएशन झाल्यावर थेट वाडीला शेती करायला दाखल. शेतीतही नवीन प्रयोग चालूच. एकदा भेळीच्या कि भज्यांना गुंडाळून आलेला कागदावर ईस्राईलमधील प्रगत शेतीवर लेख होता. झालं, याला आता ईस्राइलनं झपाटलं. त्याकाळात आजसारखी साधनं नव्हती त्यामुळे माहिती मिळवायची कशी आणि कुठून हा प्रश्नच होता. तर हिकमती मन्याकाकानं त्यावरही तोडगा शोधलाच. त्यानं थेट 'Hon. Prime Minister, Israel, Tel Aviv' या पत्त्यावरच पत्र पाठवुन, त्यांनाच माहिती देण्याची विनंती केली. बऱ्याच दिवसांनी मन्याकाकाच्या नावाने एक भलंमोठं पार्सल आलं. इस्राएलच्या पंतप्रधानांकडून. त्यात एक कौतुकाचं पत्र्, अनेक माहितीपत्रके आणि अत्यंत अनमोल अशी अनेक बियाणं होती. ते पाहुन मन्याकाकाला शंभर हत्तींचे बळ आलं. झपाटल्यागत तो शेतात राबत होताच त्यात आता या नव्या ज्ञानाची आणि बियाणांची भर पडली. 'बामनाचा मळा' आता अधिक पिकायला लागला. 

पुढं लग्नाची वेळ आल्यावर त्यानं अनेक सधन बापांच्या मुली नाकारून शेतीची आवड असलेल्या शेवडे गुरुजींच्या नलिनीला पसंत केलं. नलिनी काकू आणि मन्याकाका असं जोडपं क्वचितच बघायला मिळतं. दोघंही खप्ये. कष्टाच्या वेळी कष्ट करणार, जरासुद्धा हयगय नाही. गड्यानं जरा कामचुकारपणा केला तर रागे भरायला मागेपुढे पाहणार नाही पण त्याच गड्याला दुखलं-खुपलं तर त्याचे आई-बाप काय करतील इतकं करणार. लग्नानंतरच्या पहिल्या श्रावणांत काकूला माहेरची सय यायला लागली, तर मन्याकाका म्हणाला ,"तुला येते तशी तुझ्या आईला पण तिच्या माहेरची आठवण येतच असेल कि. आता शेतीच्या कामांत खोळंबा होईल तू गेलीस तर. त्यापेक्षा तिलाच बोलावुन घे इकडं. करा नागपंचमी आणि मंगळागौर इकडंच. तूच तुझ्या आईचं माहेरपण कर".

असलं विचित्रपण सोबत घेऊन काकूंनी संसार केला.

'नीरु ' सारखा गुणवान मुलगा आहे, आयुष्यभर राबुन पिकता ठेवलेला 'बामनाचा मळा' आहे, नलिनी काकू सारखी आदर्श सहचारिणी आहे. या अतीव समाधानाने मन्याकाका संपन्न आयुष्य जगून आपली इहलोकीची यात्रा संपवता झाला.

दु:ख तर अपार झालंय. पण त्याला अभिमानाची किनार आहे. असा लोकविलक्षण माणूस आपला सगासोयरा आहे आणि त्याचं ते मनापासुनचं धडपडणं आपल्याला अनुभवता आलं आणि काही अंशी का होईना आपल्या परीनं आपल्या आयुष्यात पेरता आलं याचं सुख पण होतं. बाहेर लोकांची अफाट गर्दी होती, पण मन्याकाकांची शिस्त आणि धाक अजुन होता म्हणुन कि काय कुठलाही गोंगाट नव्हता.

दु:खाचे कढ आवरून आम्ही पुढच्या तयारीला लागणार ,तेवढ्यात दारासमोर दोन मोठ्या गाड्या थांबल्या. त्यातुन दोन अगदी दिसताक्षणी सधन वाटावीत अशी कुटुंबं उतरली. त्यातले दोघे म्हातारे कसंबसं रडू आवरत मन्याकाकाच्या पार्थिवापर्यंत पोहोचले आणि त्यांनी स्वत:ला त्याच्या पायावर अक्षरशः झोकुन दिलं आणि मोठ्यानं गळा काढत त्यांच्या भावनांना वाट करून दिली. कोण होते ते? मी नीरूकडे बघितलं तर तो माहिती नाही अशा अर्थानं मान हलवत होता. थोड्यावेळाने त्यातल्या एका म्हाताऱ्यानं पिशवितून एक रेशमी महावस्त्र काढलं आणि त्या दोघांनी मन्याकाकाच्या देहावर पांघरलं. एक जण तिथंच बसला आणि दुसरा हळूहळू चालत नीरुपाशी गेला.

"निरुदादा, लई वाईट झालं बघ. असला जंक्शन मानूस बघायलाबी भेटायचा न्हाई. लई भारी होता तुझा बाप. आता जप सोताला". नंतर तो माझ्याकडे आला.
" शिरूदादा न्हवं? म्हंजी डाक्टर  शिरुच ना?"
मी मान हलवली. "पण मी ओळखलं नाही आपल्याला".
"न्हाईच वळकायचा तू ". फकस्त ह्योच वळखुन व्हता आमाला." त्यानं मन्याकाकाच्या पार्थिवाकडे बोट दाखवून म्हणाला.
" मी सखाराम, अन् त्यो धोंडिबा. हितुन पाच कोसावर आमचं गाव".
" पण पाहिलं नाही कधी तुम्हांला याआधी".
"आरं, बघनार कधी? दुसरीच खेप आमची. पैल्याच टायमाला मन्याबामनानं हग्या दम दिलता का पुना हिकडं तडमडाचं ते माझ्या धेहावर चादर टाकायलाच".

"पण कशाला आणि कधी आला होतात तुम्ही?".

"ती बी लई मोठी ष्टोरीच हाय. भात्तर सालच्या दुस्काळातली. आभाळ रूसल्यालं, घरात खायला दाना न्हाई आन् खिशात दिडक्यांचा पत्त्या न्हाई. आयबाप म्हातारं झाल्यालं आन् पोरंबाळं बारकी. कमावनारी दोगच, मी आनी बायकू. खानारी तोंडं धा. कुठं रोजंदारीवर मिळेल तितं जायचं आन् मिळालेल्या मजुरीतनं मिळंल तितनं धान्य आनायचं. पन त्ये बी मिळेना झालं. फाकं पडाय लागलं. धोंडिबाच्याकडंपन ह्येच हाल. पीट हाय तर मीठ न्हाई आन् मीठ असलं तर पीट संपल्यालं. नशिबाचा भोग निस्ता. काय करावं त्येच सुदरंना. पोट खपाटीला गेलेले आई-बाप, भुकेनं तोंड बारकी झालेली पोरं पघुन जीव लयी पाळायचा”.

“ एक दिस धोंड्यान आन मी ठरिवल का कायबी करायचं पण ल्येकारास्नी उपाशी न्हायी ठीवायाच. ‘बामनाचा मळा’ ठाव व्हता. मन्या बामन पैका बाळगून व्हता याची खबर व्हती. आमाला पैका नकू व्हता, खायला धान्य पाहिजे व्हत. मन घट केलं आणि ठरिवल का मन्या बामनाला लुटायचा. सगळी खबर काढली. काकी न्येमकी कुडतरी बाहीर्गावी ग्येलेली. सांजच्या टायमाला समद गडी-मानस ग्येल्यावर मन्याबामन एकलाच रहातो. त्याच टायमाला त्याला झडपायचा. ठरल्यापरमान आमी येळ सादली. काळोखातच मन्याकाकावर घोंगड टाकल आणि लयी हानला. पण मन्याकाका आयकतो व्हय. आमाला दोगाना बी आटपना. संदी सादून त्यो सटकला. धोंड्याच्या त्वान्डावर जोराचा फटका हानला तर त्याच दातच पडल. त्वांड धरून धोंड्या बोंबलत खाली पडला. मंग मान्याकाका माह्याकड वळला. मला धरून लयी धुतला त्यान. तीन दिस पोटात आन्न नाही. कसलं बळ आसनार आमच्या अंगात. समोर तर ह्यो आडदांड गडी. मी खाली पडल्यावर त्यान खुंटीच दावं काढलं आनी दोघास्नी बांधून घालून सोता घरात निघून ग्येला. रातभर आमी विवळत पडल्यालो”.
“ सकाळच्या पारी मान्याकाका बाहीर आला. दावं सोडलं आनी आमास्नी प्याया पाणी दिल आणि थोडी भाकर दिली. भाकर खाऊन झाल्यावर पुन्ना करकचून बांदून ठिवल आणि फटफटीला किक मारून कुडतरी ग्येला. आमचा ख्येळ संपला. आता ह्यो पोलिसाना घ्येऊन येनार आनी पोलीस आमची वरात काडनार. आमी नशिबाला दोष देत बसल्यालो. हालता बी येत नव्हत. थोड्या टायमानी पुन्यांदा फटफटीचा आवाज याया लागला. म्हनलं आता आपले दिस भरले. पन मन्याकाका येकलाच आलेला. पिशवीतून औशीद काडल. दावं सोडून आमास्नी मोकळ क्येलं. औशीद लावलं. भरपेट खायाला दिल. म्हणाला कशापायी चोऱ्या करून राहिले? आमी आमची चित्तरकथा सांगितली. आमी काय चोर न्ह्यायी पन परीस्तीती भाग पाड्तीया. घरात खायला दाना न्हायी आणि उपाशी पोर-बाळ कशी पघायाची.

“ तसा मान्याबामन उटला आणि घरात ग्येला. घरातून दोन पिशव्या आनल्या. त्यात दोन-दोन पायली धान्या वतलं आणि आमास्नी दिल्या. खिश्यात हात घातला आनी लायी आजीब क्येलं. दोन हज्जार काडले आणि आमास्नी दिले.

“ आजपासून चोऱ्या करायच्या नाहीत. हे पैसे दिलेत त्यातून धंदा चालू करा. काय जमत तुम्हाला?”
“ मला फकस्त लयीभारी चा बनिवता येतो.” धोंड्या बोल्ला
“ मग तू चहाची गाडी टाक. आणि तुला रे?”
“ मला काय बी येत नाय. पन कारभारीन लायी भारी भजी बनीवती”.
“ मग तू भज्यांची गाडी सुरु कर. कोपरगावला सुरु करा. हे पैसे तुम्हाला बक्षीस. परत द्यायचं नाव काढलं तर पुन्हा मारीन. आणि हो, पैसे उडविलेत तर माझ्यासारखा वाईट कोणी नाही हे लक्षात ठेवा. मी वेळोवेळी येऊन लक्ष ठेविनच”.


“ शिरुदादा, आमाला तर द्येवच भेटला बघ. काय कराय आल्तो आन काय घडलं बघ.”

मंग आमी आमच्या गाड्या चालू केल्या. धोंड्यान तर गाडीवर ‘बामनाचा चहा’ म्हणूनच पाटी लावली. लयी फेमस जाला त्यो. पन माज काय बस्तान बसना. मंग एक डाव मन्याबामन आला होता त्याला म्हणल का इथ काय चालना माज. तर त्यो म्हनाला का तू इथून उठ आणि शिर्डीला जा. तिथं लयी डिमांड हाये. उठलो आणि शिर्डीला ग्येलो. साईबाबाच पावलं बग. लयी जोरात चालाय लागली आमची ‘काकाची मिसळ’.

“ आता धोंड्याची दोन हाटेल आणि एक स्टोर हाये. माज एक लाजिंग, बोर्डिंग आणि काकाची मिसळ हाये. लयी झकास चाललंय आमच.”
“ मान्याबाम्नाकड चोरी करायची बुद्धी ज्या भगवंतान दिली त्याच लयी आभार बाबा”.

सखाराम बोलायचा थांबला. त्याच्या गळ्यातून शब्दच उमटेनात. गळा भरून आलेला आणि डोळ्यातून अखंड अश्रुधारा चालू. आम्हाला हे काही ठाऊकच नव्हत. मन्याकाका कधीच चकार शब्द देखील बोलला नव्हता. इतकी निशब्द कृती मन्याकाकाच करू जाणे.

रस, रूप, गंध आणि चवहीन असलेल्या ‘पडवळ’ नावाच्या भाजीच नाव घेऊन जगलेला हा माणूस वास्तवात इतका गोडवा निर्माण करू शकतो? आईला दिलेल्या वाचनाला जागून आयुष्यभर पडवळ खाल्लेला माणूस स्वतः मात्र अतिशय रुचीसंपन्न आयुष्य जगला. आजवर त्याला ‘मन्याकाका’ म्हणून नमस्कार केला पण आता हा शेवटचा नमस्कार मात्र त्या
‘गोड पडवळाला’.

श्रीकुल.




Sunday, 3 June 2018

एडिटिंग




एक वर्ष होऊन गेलं विजूमामा नाहिसा होऊन.

" प्रिय राधा,आयुष्याचा अर्थ शोधायला चाललोय, शोधू नका. "

तुझा अपराधी,
विजू

तेवढी बोटभर चिठ्ठी फक्त मागे. किती शोधलं आप्पांनी? अगदी बद्री, केदारला देखील जाऊन आले. पण नाही पत्ता लागला त्याचा. राधामामीचे वडिल म्हणजे पुण्यातले नामांकित शास्त्री. सरस्वतीचं वरदान पण लक्ष्मी कायम रूसलेली. आईमागे पोर वाढवली. तिला तिच्या घरी पाठवली की मी मोकळा , असं अनेकदा वाटे त्यांना. पॉलिसीच्या  निमित्ताने आमचे आप्पा भेटले. विषयांतुन विषय निघत गेला आणि गाडी शास्त्रीबुवांच्या मुलीच्या लग्नापर्यत आली. आप्पांनी स्वत:च्याच मेव्हण्याचं म्हणजे विजूमामाचं स्थळ सुचवलं. सदाशिवात भला मोठा वाडा, ऊरळीला पाण्याखालचा पन्नास एकरांचा सोन्याचा तुकडा, मुलगा एम.एस्सी. अजुन काय पाहिजे मुलीच्या बापाला खुष व्हायला. खर्चाची अडचण होती खरी पण मुलाकडून बोलणी करायला आमचे आप्पाच. त्यांनी घेतलं सगळं जुळवुन आणि एका शुभमुहूर्ती 'राधामामी' नांवाचा एक विलक्षण अध्याय सुरू झाला.

पण आरस्पानी सौंदर्याला काय शाप असतो कुणास ठाऊक? जन्मानंतर "आई' म्हणजे काय हे कळायच्या आतच तिचं छत्र गमावलं आणि संसार फुलतोय आता,  असं वाटायच्या आत नवरा नाहिसा झाला. कसला अर्थ शोधायचा होता त्याला? संसारात राहुन नसता का सापडला जीवनाचा अर्थ? असं विपरित घडावंच का माझ्याबाबतीत?

यातल्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर ना राधामामीकडं होतं ना आई- आप्पांकडे. मुलीच्या दु:खाने शास्त्रीबुवा खचलेच आणि वर्षभरात ते देखील गेले. भगवंताला जाब विचारायला. अगदीच पोरक्या झालेल्या राधामामीच्या पाठिशी माझी आई अगदी खंबीरपणे उभी राहिली. आमचं धायरीतलं दोन खोल्यांचं घर सोडुन राधामामीच्या वाड्यात मुक्काम हलविला. आप्पांची एलायसी एजन्सी तशी रूटुखुटुच चालली होती. पीठ आहे तर मीठ नाही अशी अवस्था असायची अनेकदा. त्यातच सारखी घरं बदलायची कटकट. आईनं लोकं काय म्हणतील याची पर्वा न करता निर्णय घेतला. 

विजूमामाला सापडला किंवा नाही ते माहित नाही पण मी वाड्यात रहायला गेल्यापासून राधा मामीला मात्र जीवनाचा‌ अर्थ सापडला असावा. न लाभलेल्या मातृत्वाची कसर तिनं माझ्यावर अपार माया करून भरून काढायला सुरुवात केली. माझी शाळा, दप्तर, अभ्यास, तबल्याचा क्लास सगळं अगदी ताब्यातच घेतलं तिनं. आई तर म्हणायची सुध्दा
" राधे, कधी कधी कळतंच नाही किंवा चंद्रू माझा मुलगा आहे की तुझा? किती माया लावतेस गं ?"

या विलक्षण प्रेमाबरोबरच आणखी एक गोष्ट राधामामीकडं होती आणि ती म्हणजे तिला शेकडो गोष्टी पाठ होत्या. पुराणातल्या, वेदांतल्या, इतिहासातल्या, महापुरूषांच्या अशा गोष्टींचा खजिना होता तिच्याकडे.तिच्या नेहमीच्या बोलण्यातदेखील सतत असे पुराणात ले नाहितर वेदातले दाखले असायचे. सूर्यनमस्कार, अभ्यास आणि तबल्याचा रियाझ या तीन गोष्टी मी पुर्ण केल्या तरच ती नवी गोष्ट सांगायची.

राधामामीच्या गोष्टी ऐकता ऐकता दिवस भरभर जात होते. विजू मामाचा अजुन पत्ता नव्हता. आई-आप्पांनी कितीतरी वेळा राधा मामीला दुसऱ्या लग्नाबद्दल विचारलं.  पण तीनं प्रत्येक वेळेला स्पष्ट नकार दिला. एकदा तर आई हटुनच बसली," राधे, तू हो म्हणत नाहीस तोवर मी अन्न-पाणी घेणारच नाही."
संध्याकाळपर्यंत राधामामीनं वाट पाहिली. संध्याकाळी ताट वाढुन आईसमोर गेली आणि म्हणाली,
" आक्का, म्हणजे लढाईला गेलेला वाली परत येणार नाही म्हणुन तारेनं दुसरा नवरा स्विकारला. तसंच ना? आणि माझा नवरा परत आल्यावर माझी सुटका करणारा 'प्रभू राम' कुठून आणायचा? माझा नवरा काहितरी शोधायला गेलाय, मला टांकुन गेला नाही."
"आता प्रत्येक स्त्रीनं स्वता:च 'रामरूप' धारण करायला नको का?"
" पोरी, कुठून आणलंस गं हे शहाणपण आणि त्या नतद्रष्टाला का नाही दिसलं म्हणते मी?"
दोघी गळ्यांतगळे घालून रडल्या. नंतर हा विषय कायमचाच थांबला.

विषय थांबला पण काळ पुढे जातच रहातो. माझं इंजिनिअरिंग चालू होतं आणि आप्पांना ' बेस्ट परफॉर्मर' अॅवॉर्ड मिळालं. बक्षिस म्हणुन एक कॉंम्प्युटर मिळाला. त्या कॉंम्प्युटरनं मला वेडं केलं. दिवस-रात्र त्यांच्याशी खेळणं सुरु झालं. विशेषतः फोटोशॉप मध्येतर मी अगदीच 'किडा' झालो. शेकड्यांनी फोटो अल्बमस आणि वेडिंग व्हिडिओ मी एडिट करून दिले. माझं असं चालू असतानाच आप्पांना ' खंबाटा' भेटला. हा टिपिकल 'पारसी बाबाजी' FTII मध्ये एडिटिंग डिपार्टमेंटचा हेड अॉफ द डिपार्टमेंट होता. त्यानं माझं फोटोशॉपचं वेड बघितलं आणि मला एडिटिंगचा कोर्स करायला सांगितला. एन्ट्रन्स पास करणं मला जड गेलं नाही. मी रीतसर FTII मध्ये दाखल झालो आणि पुढची दोन वर्षे अक्षरशः धुंदीत गेली. ' खंबाटा' सारखा चक्रम पण अफाट ज्ञानी शिक्षक आणि माझ्यासारखा चिकट विद्यार्थी. आमचं चांगलंच जमलं. 'खंबाटा'ने हातचं काहिही राखुन न ठेवता मुक्तपणे आम्हांला वाटुन टाकलं.

"हे तुझं एडिटिंग नक्की काय असतं रे, चंद्रू?" आईचा प्रश्र्न.

"अगं, फिल्म करतांना ना, खूप जास्तीचं शूटिंग करून ठेवतात. आपण कुठं एवढी सगळी फिल्म बघणार? मग एडिटर काय करतो कि त्या सगळ्या फाफटपसाऱ्यातुन आवश्यक तेवढा आणि कथेशी सुसंगत भागच जोडतो. आणि मग आपण पहातो तो पिक्चर तयार होतो. अगदी सुटसुटीत. कधीकधी तर मूळ फिल्म इतकी बेंगरूळ असते कि  बघवत पण नाही.  पण काही अगदी पोचलेले एडिटर्स असतात ना,  ते अशी  काही कात्री चालवतात ना की अगदी सुंदर फायनल प्रिंट येते." मला जमेल तसं सांगितलं.

"अय्या , म्हणजे पुराणकालीन ऋषी जसे कायापालट करायचे तसंच ना?" राधा मामीचा पुराणकालीन दाखला.

आम्ही शेवटच्या सेमिस्टरचा प्रोजेक्ट करण्यांत बिझी होतो. एके दिवशी 'खंबाटा' एका पाहुण्याला घेऊन लॅबमध्ये शिरला.
" Students, I am happy to introduce you to my friend Andre"
'आंद्रे लेरू', आणि पुण्यांत?

आम्ही अक्षरशः वेडे झालो. आंद्रे म्हणजे हॉलिवूडमधलं बडं प्रस्थ. तीन अॅकॅडमी आणि सात गोल्डन ग्लोब जिंकणारा 'आंद्रे लेरू'. त्याला नुसतं पाहाणं हाच एक दिव्य अनुभव होता. सहा फूट उंची, सोनेरी कुरळे केस आणि ग्रीक देवते सारखा दिसणारा 'आंद्रे लेरू' हा नितांत देखणा, टिपिकल फ्रेंचमन होता.
पुढचे तीन दिवस आम्ही झोपलोच नाही. अलेक्झांडरच्या मोहिमेवर आधारित एक एपिक 'आंद्रे' निर्माण करणार होता. त्यासाठी काही संदर्भ आणि जमलंच तर काही माणसं शोधायला तो भारतात आला होता. तो विद्यार्थी असल्यापासून 'खंबाटा'ला ओळखायचा. म्हणुन त्याला भेटायला पुण्यात.
' खंबाटा' सारखा जातिवंत मास्तर ही संधी कशाला सोडतोय. त्यानं आम्हां सर्वांना आपापले प्रोजेक्ट्स
' आंद्रे'ला दाखवायला सांगितले.
माझा प्रोजेक्ट पाहुन 'आंद्रे' भलताच खुश झाला. त्यानं सरळ मला त्यांच्याबरोबर काम करणार का असं विचारलं. माझी वाचाच बसलेली. माझ्या वतीने ' खंबाटा'च बोलला.
"He will come, only if you pay him handsomely and make arrangements  for his accommodation there"

'आंद्रे'नं या किरकोळ अटी मान्य केल्या आणि परत गेल्यावर पेपर्स पाठवतो असं सांगितलं.

अस्मादिक हवेत तरंगत घरी गेले. घरी सांगितलं. 

' आंद्रे'चं नांव ऐकून राधामामी म्हणाली,
"कसं नांव आहे ना? इंद्रा सारखं वाटतंय."

आंद्रे'कडुन पेपर्स आले आणि माझी तयारी चालू झाली. आम्ही असेच माझ्या हॉलिवूड पदार्पण, अमेरिका तिथलं वातावरण याविषयी बोलताना होतो. तर आई एकदम म्हणाली,
" चंद्रू , तुझ्याबरोबर राधेला घेऊन जा"
मी ऐकुन न ऐकल्यासारखं केलं पण आप्पांनी मात्र मनावरच घेतलं आणि राधामामीसाठी पासपोर्ट आणि टूरिस्ट व्हिसा करूनच आणला.

आम्ही दोघं ग्लेनडेल गावी पोहोचलो. आंद्रेच्या सांगण्यावरून ' युनिव्हर्सल स्टुडिओ' नं मला एक छोटं अपार्टमेंट दिलं होतं. मी आणि राधामामीनं तिथं डेरा जमवला. एरव्ही पुण्याबाहेर पण क्वचितच गेलेल्या राधामामीनं नव्या गावाशी आणि वातावरणाशी झक्क जुळवुन घेतलं. अगदी ग्लेनडेलच्या मार्केटमधुन नेहमीचं गिर्हाईक असल्यासारखी शॉपिंग करायला लागली.

माझं काम व्यवस्थित चालू होतं. युनिव्हर्सलच्या या प्रोजेक्टसाठी अगदी जगभरातील कलाकार, तंत्रज्ञ आणले होते. अनेक भाषा बोलणारे, वेगवेगळ्या रंगांचे अनेक लोक तिथं होते. पण 'आंद्रे'ची आखणी आणि शिस्त वाखाणण्याजोगी होती. 'सिमोन', सिमोन वॉलेस सोडून कोणालाच मोकळीक अशी नव्हती. विलक्षण देखणी         ' सिमोन' प्रोजेक्टमध्ये नसुनही अगदी तोऱ्यात वाव रयची. आता खुद्द ' आंद्रे' ची गर्लफ्रेंड आणि आख्खं हॉलिवूड जिच्यासाठी पागल होतं तिचा इतका तोरा असणारच ना.

एक शेड्यूल जरा लवकर संपलं. त्यादिवशी 'आंद्रे'नं डिनर पार्टी अनाऊन्स केली. आम्ही सगळ्यांनी 'ट्रॅडिशनल' ड्रेसकोड ठरवला. मी घरी आलो. राधा मामीला पार्टिचं सांगितलं आणि सहजच विचारलं किंवा "येतेस. का तू?"
तर चक्क "हो" म्हणाली. 
मी 'आंद्रे'ला मेसेज टाकुन, गेस्ट आणता येईल का ते विचारलं. तर तोही हो म्हणाला.
" राधा मामी, चल आटप लवकर. इथं वेळेवर जावं लागतं."
"आलेच" म्हणुन ती आवरायला गेली ती चक्क 'नऊवारी पैठणी' नेसूनच आली. काय दिसतं होती! देवघरातल्या समईसारखा तिचा चेहरा अधिकच खुलून दिसत होता. जणू तिच्याच कथेतील पुराणकालीन देवता.
" चक्क पैठणी? कुठून आणलीस?"
"आक्कांनीच आणली होती. बळेच बॅगेत भरली".

आम्ही वैळेआधीच पोहोचलो. प्रत्येकजण राधामामीकडे टक लावून बघत होता. 'आंद्रे' आला बरोबर लावण्यवती
 ' सिमोन' होतीच. एकेकाशी बोलत आमच्याकडे आला. त्यानं राधा मामीला बघितलं आणि बघतच राहिला.
" She is so beautiful!"
पूर्णवेळ तो आमच्या पासुन हललाच नाही. तो स्वत: त्यांच्या गाडीने सोडायला घरापर्यंत आला. त्यानंतर नेहमी येतच गेला. 

मला कळेचना किंवा हा असा का वागतोय? मी जरी बुद्दू असलो तरी सिमोन चतुर होती. तीनं आंद्रेच्या मागे लग्नाचा लकडाच लावला. त्या दोघांची या विषयावरची बोलणी आमच्याच लॅबमध्ये चालत. कधीकधी त्यांची भांडणंही होतं. पण आंद्रे तिला काही केल्या होकार देत नव्हता.

एके दिवशी आम्ही असेच कामात मग्न होतो. सिमोन तिथेच होती. फारच अस्वस्थ दिसत होती. एवढ्यात दार ढकलून आंद्रे आला. आधीच गोरापान असलेला आंद्रे अगदी लालबुंद दिसत  होता आणि थोडासा लंगडत पण होता. त्यानं सिमोनला पाहिलं आणि तिच्यापुढे जाऊन गुढघ्यावर बसला आणि तिच्या नजरेला नजर भिडली विचारलं,
'Will you marry me?'

सिमोनला आपल्या कानांवर विश्वासच बसेना. 'येस' असं किंचाळून ती रडायलाच लागली आणि बाकी सगळे हसायला.

पुढच्याच रविवारी, मी आणि राधा मामी , आंद्रे आणि सिमोनचं लग्न आटोपुन घरी परत आलो.

' छान झालं ना लग्न? पण मला कळत नाही कि आंद्रे असा बदलला कसा?' मी
' चंद्रू, बैस तुला गोष्ट सांगते'
'आं!आज अचानक गोष्टींचा मूड? गृहपाठ नाही केला मी आज'.
' नाठाळपणा पुरे तुझा. बस इथे.'
माझी काय हिंमत नाही म्हणायची.
' तुला अहल्या आठवते का रे? गौतम ॠषींची पत्नी?'
' तर, गौतम ॠषी तर नाहीतच पण अहल्येपाशी कोणीच नाही हे पाहून इंद्र अहल्येच्या दारी आला आणि त्यानं चक्क  तिला मागणीच घातली. अहल्येनं त्याला अर्थात नकारच दिला. गौतमावर आपलं प्रेम असल्याचं सांगितलं आणि त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणाचाही ती विचारच करू शकत नसल्याचं स्पष्ट केलं. पण ईंद्र हट्टालाच पेटला. तो ऐकेचना. मग अहल्येनं इंद्राचे गाल रंगवुन काढले आणि तिच्यापुढे वाकलेल्या इंद्राच्या गुढघ्यावर सणसणीत लाथा घातल्या. अहल्येच्या दुर्गावताराने घाबरलेला इंद्र पळून गेला मग.'

'म्हणजे, तू आंद्रेला? आंद्रेनं तुला......

तेवढ्यात फोन किणकिणला. आई होती.
' अरे कुठे आहेस तू? राधा कुठंय? कशी आहे ती?'
'आई, राधा मामी एडिटर झाली एडिटर! आख्ख्या माणसाचा कायापालट केलाय तिनं'.

कानसेन-घराणं पुणे

 संगीतक्षेत्रात घराण्यांचा मोठा बोलबाला अजुनही आहे. प्रत्येक घराण्याचं आपलं असं एक गायकी वैशिष्ट्य आहे. किंबहुना ही वैशिष्ट्यविविधता हाच दोन...