Sunday, 11 August 2019

विदर्भकन्या

प्रत्येक जागेला एक कहाणी असते. आपल्या जन्मगावाशि किंवा ज्या जागी आपण वाढतो, घडतो त्या जागेविषयीच्या तर अनंत कहाण्या मनात घर करुन असतात. काही वेळा मन कातर होऊन जातं आणि या तळाशी निवांत पहुडलेल्या कहाण्या वरवर येतात. लाटांवर लाटा येतात आणि घडतं ते चिंब करणारं स्वप्नस्नान. यातली मेख अशी कि आठवू म्हणता आठवेना असं अनेकदा घडतं आणि कुठल्यातरी अनामिक खुणगाठेतून आठवणींच्या लडीवर लडी उलगडतात आणि आठवांचा चलचित्रपट मनाच्या पडद्यावर सुरू होतो. तो थांबवणं आपल्या हातात मात्र नसतं.
अमरावतीला जाणं तसं अचानकच ठरलं. भारीच गडबड झाली. पेशंट तपासले आणि अचानक घरी जाऊन शरयूला सांगितलं,
"माझी बॅग भरायला मदत कर मी अमरावतीला निघालोय" शरयू अवाक. अशा अवाक स्थितितली बायको शतप्रतिशत संशयीप्रश्न विचारतेच.
"कोणाबरोबर?"
आता मी अवाक.
" कोणाबरोबर म्हणजे? तुला काय वाटलं?"
"मला काहिच अंदाज नाही म्हणुन विचारलं कि बरोबर कोण आहे? आणि आज अचानक "अमरावतीचं' प्रेम ऊफाळुन आलंय. तर विचारावं म्हटलं"
"तू भलते विचार करू नकोस, गोंद्याचं लेक्चर आहे तिथं ऊद्या तर तो म्हणाला कि चल बरोबर. नाहीतरी रविवारी तू शरयूचं डोकं खाण्याशिवाय दुसरं काय करणारेस? तस्मात आस्मादिकांनी त्वरित निर्णय घेतला आणि निघालोय. स—म—ज—लं ?"
"अमरावतीचे निर्णय कसे झटपट होतात ना! रोखुन बघू नकोस, वेडसर वाटतो आहेस. घे तुझी बॅग."

अमरावतीचे निर्णय?

मला बाउंसर होता. मी काही विचारणार इतक्यात
"शीर्‍या' ए वैदू चल लवकर"अशी ,आदरणिय डॉ. गोंद्याची (M. Tech. Ph.D.) हाक आली. मी झटपट निघालो पण.

प्रवास आणि गोंद्याबरोबर म्हणजे डबल धमाल. तेवढं त्याचं भसाड्या आवाजातलं मुक्तगान आणि जणू टास्मानियन डेव्हिलच्या वंशात असल्यासारखं अखंड चरणं सोडुन.

सकाळी अमरावतीला पोहोचलो. शरयूला फोन केला.
तर मी काही बोलायच्या आतच बाईसाहेब
"पोहोचले का लाडक्या अमरावतीला?"
" शरयू, काय चालवलं आहेस हे?"
" काहि नाहि, मी मुलींना घेऊन तुळशीबागेत भटकायला जाणार आहे"
"हॉस्पिटल?"
"सगळी बाळं ठणठणीत आहेत आणि त्याच्या आया मजेत आहेत. तू कापाकापी केलेल्याकडे डाॅ अवी बघेलच. चल बाय. मला आवरायचंय. ए वल्लरी आवर गं"

हा गुगली मला समजलाच नाही. शरयू इतकी अपसेट का? जाऊदेत, असेल काहितरी. मी विषय सोडुन दिला. गोंद्याच्या कार्यक्रमाचे आयोजक आले होते त्यांच्याबरोबर गांव बघायला निघालो.

एका नितांतसुंदर प्राचीन मंदिरात आम्ही गेलो. अतिशय देखणं देऊळ.मी भान हरपुन बघत होतो. किती सुंदर कलाकुसर, दगड नव्हतेच. काळ्याकभिन्न, बोलक्या प्रतिमा. त्यांना जर कंठ फुटला तर आत्ता सांगतील त्या कहाण्या, त्यांना घडविणार्‍यांच्या.

आयोजक सांगत होते,
"अशी अख्यायिका आहे कि क्रुष्णानं रूक्मिणीहरण याच मंदिरातुन केलं. ती विदर्भकन्या होती ना?

'विदर्भकन्या' हा शब्द कानी पडला आणि मी 'माझा न मी राहिलो'.वयाची पस्तीसहुन अधिक वर्षै गळून पडली. मी आणि चित्रा नववीत होतो. आमची वक्त्रुत्वस्पर्धा होती. स्पर्धा म्हणजे तसा मी जिंकणारच होतो पण औपचारिकता बाकी होती इतकंच. विषय छानच होता. 'स्त्री—स्वातंत्त्र्य आणि परंपरा'. जरा जडच विषय होता पण चित्राच्या आईकडुन संदर्भपुस्तकं आणुन मी जाम तयारी केली होती. भाषणबिषण हा चित्राचा प्रांत नव्हता. तिनं आदल्यादिवशी माझं भाषण ऐकलं आणि निकालच जाहिर केला
"नानू, किती छान बोलतोस रे तू! पहिलं बक्षिस तुलाच"
माझ्या अंगावर मूठभर मांस चढलं या कौतुकाने.

स्पर्धा सुरू झाली. आमची भाषणं झाली.माझ्या भाषणानंतर टाळ्यांचा कडकडाट. मी उपनिषदांचे दाखले देउन सांगितलं कि स्त्रीस्वातंत्र्य हीच आपली परंपरा आहे. गार्गी, मैत्रेयी सारख्या विदुषी या या स्वातंत्याची मधुर फळं आहेत. सरतेशेवटी,
अहल्या द्रौपदी तारा, सीता मंदोदरी तथा
पंचकन्या स्मरैन्नित्यम, सर्व पातकनाशनम
हा श्र्लोक म्हणुन खाली बसलो. दोघेतिघे शिक्षक माझं अभिनंदन करून गेले. आमचे हेडसर माझ्याजवळ आले आणि काहिही न बोलता त्यांनीमला पोटाशी धरलं. आता बक्षिस पक्कं.
स्टेजवर गेल्यावर हेडसरांना काय वाटलं कोणास ठाऊक त्यांनी विचारलं कि ऐनवेळी कोणाला बोलायचं आहे का?
एक हात अनपेक्षित होता. चित्रा उभी राहिली आणि स्टेजवर गेली. त्यानंतरची पंधरा मिनिटे आठवली कि आजही अंगावर सर्रकन काटा येतो. भाषण कसलं, अंगार ओकत होती.
" हा विषयच चुकीचा आहे. स्त्री हा स्वातंत्र्याचा पहिला
स्वर आहे. तिचं स्वातंत्र्त्र देवदत्त आहे, निसर्गदत्त आहे.
पुरुषांना असलेलं स्वातंत्र्य ही स्त्रीनं उदारतेनं दिलेली मुभा आहे इतकंच. स्वातंत्र्याचा अर्थ उमगलेलि स्त्री आपलं अंगण स्वताच ठरविते आणि त्या अंगणाचं नंदनवन करु शकते. मी विदर्भकन्या आहे. विदर्भाच्या तीन कन्यांनी मी जे सांगते आहे ते जगुन दाखवलंय.
एक रूक्मिणी होती, तिच्या वडिलांनी तिचा विवाह चेदिराज शिशूपालाशी ठरविला पण तिच्या मनी क्रुष्ण होता. श्र्लेषअलंकार आठवतो ना?

'शिशुपाल नवरा, मी न—वरी
श्रीक्रुष्ण नवरा, मी नवरी'

स्वयंनिर्णयाचं स्वातंत्र्य.

हेच दुसर्‍या विदर्भकन्येनं म्हणजे दमयंतीनंदेखील केलं

तिसर्‍या विदर्भकन्येनं म्हणजे वीरमाता जिजाईनं तर एकूणच स्वातंत्र्याला नवा अर्थ दिला. परंपरांचं म्हणाल तर सीता आणि सावित्रीपासुनचं सांगता येईल कि स्वातंत्र्याची उद्गाती तीच आहे आणि तिनंच स्वमर्यादांची आखणी केलेली दिसते. "

चित्रा थांबली. आम्ही इतके आवाक झालो होतो कि टाळ्या वाजवायचंदेखील भान नव्हतं.

पहिलं बक्षिस पहिल्यंदाच माझ्या हातुन गेलं पण आज मला पराजयातदेखील आनंद वाटत होता.

बक्षिस घ्यायला चित्रा टाळ्याच्या कडकडाटातच स्टेजवर गेली. आणि अपूर्वाईचं केलं.

"मला बक्षिस घेण्याआधी बोलायचं आहे"

हेडसरांनी परवानगी दिली.

"मी ऐक मुलगी आहे आणिमीस्त्रियांच्या बाजुनेच बोलणार पण शिर्‍यानं मुलगा असुनहि स्त्रियांची बाजू फार अभ्यासपूर्ण मांडली. सर, मला हे पारितोषिक त्याच्या बरोबर शेअर करता येईल का? हा स्वयंनिर्णय मला घेऊ द्याल ना सर?"

गदगदलेले हेडसर ओठांनी बोलूच शकले नाहित त्यांनी डोळ्यांनीच होकार दिला.

शाळेत आणि कॉलेजमध्ये मिळविलेली शेकडो
बक्षिसं कुठंतरी पडली आहेत.हा छोटुला कप मात्र शोकेसमध्ये अगदी पुढे आहे.

पुण्याला परत आलो.

प्रवासाने दमलो होतो. मुलींना पाहुन थकवा दूर पळाला. माझ्या गळ्यात पडुन वल्लरी म्हणाली
"अरे आम्ही ना झकास मजा केली. खूप फिरलो, काय काय घेतलं आईनं आम्हांला. आणि ऐक ना आईनी ना तुझा तो लाडका बक्षिसाचा कप आहे ना त्याला तुळशीबागेतुन मस्त पॉलिश करुन आणलंय"

"आँ!!!" माझ्या तोंडुन

"विदर्भाच्या बाहेरच्या मुलीदेखील स्वयंनिर्णय घेऊ शकतात म्हटलं" अर्थात शरयू.दुसरं कोण?

श्रीकुल
११/८/२०१९



6 comments:

  1. श्रीनिवास अप्रतिम लिखाण

    ReplyDelete
  2. श्रीनिवास अप्रतिम लिखाण

    ReplyDelete
  3. श्रीनिवास अप्रतिम लिखाण

    ReplyDelete
  4. श्रीनिवास अप्रतिम लिखाण

    ReplyDelete
  5. श्रीनिवास अप्रतिम लिखाण

    ReplyDelete
  6. श्रीनिवास अप्रतिम लिखाण

    ReplyDelete

कानसेन-घराणं पुणे

 संगीतक्षेत्रात घराण्यांचा मोठा बोलबाला अजुनही आहे. प्रत्येक घराण्याचं आपलं असं एक गायकी वैशिष्ट्य आहे. किंबहुना ही वैशिष्ट्यविविधता हाच दोन...